The Gavankars

Monday, June 11, 2018

उत्तम आणि समाधानकारक करियर कसे निवडाल ?

नमस्कार मित्रांनो . उत्तम आणि समाधानकारक करियर कसे निवडावे याबद्दल थोडी मांडणी करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न :-)

जर तुम्ही हा लेख अशा अपेक्षेने वाचायला  सुरुवात केली असेल की मी
तुम्हाला आज हमखास नोकरी आणि पैसे देणार करिअर क्षेत्र सांगणार आहे
आणि तुमच्या मुलांना अमुक-तमुक कोर्स केला की गलेलठ्ठ पगाराची नोकरी
लागेल याचे मार्गदर्शन करणार आहे तर कृपया हा लेख वाचणं
आताच बंद करा :-)




आपण या लेखांमध्ये आज करियर निवडताना मुलांनी आणि पालकांनी नक्की कसला विचार केला पाहिजे याबद्दल चर्चा
करणार आहोत आणि बऱ्याच पालकांना कदाचित ते आवडणार सुद्धा नाही . मला असे अनुभव आहेत की त्यांच्या दहावी
किंवा बारावी झालेल्या मुलाला अथवा मुलीला पालकांनी माझ्याकडे आणलं आणि त्यांची अपेक्षा अशी होती की मी त्यांना
इंजिनीअरिंग किव्वा आय टी क्षेत्रातील करियर कसे चांगले हे सांगून  इंजिनीअरिंगचा कोर्स करायला सांगेन . पण त्यांचा
भ्रमनिरास झाला आणि मी मात्र केवळ त्या विद्यार्थ्याला लॉजिकली विचार कसा करायचा हे शिकवायचा प्रयत्न केला

जेव्हा पालक त्यांच्या मुलांना घेऊन माझ्याकडे येतात आणि म्हणतात “याला जरा गाईड करा हो की हल्ली कशाला
जास्त “स्कोप” आहे “ … मी त्यांना एक प्रश्न विचारतो “स्कोप “  म्हणजे नक्की काय हो ? 90 टक्के वेळा स्कोप म्हणजे
महिन्याला लाखो रुपये देणारी गलेलठ्ठ पगाराची नोकरी एवढेच पालकांचं म्हणणं असतं पण आपल्या मुलाला काय आवडते ?
आपल्या मुलाला एखादी गोष्ट झेपेल का ? त्यासाठी करावे लागणारे कष्ट  आणि काही विशेष कोर्सेस निवडले तर त्यासाठी
येणारा खर्च यासाठी आपली आणि आपल्या मुलाची तयारी आहे का याबद्दल जाणून घेण्यात त्यांना काहीही इंटरेस्ट नसतो.  
आणि म्हणूनच मी विचार केला की या बद्दलचे माझे विचार या लेखातून मांडावेत . दहावी आणि बारावीचे निकाल लागलेले
आहेत आणि पालकांची करिअर निवडीसाठी आणि कोर्स निवडीसाठी फार धावपळ चालू आहे .

परंतु मी मात्र म्हणेन की  कुठल्याही कोर्सला ऍडमिशन घेण्याआधी खालील मुद्द्यांवर आपल्या मुलांसोबत बसून नीट
विचार करा ,चर्चा करा आणि मगच ठरवा करिअर कुठे करायचं !


१. पॅशन : ( आपली आवड) :

करियर निवडताना आपण भारतीय बऱ्याच वेळा आपल्या आवडी निवडीला काहीच महत्त्व देत नाही याचे कारण असे असेल
की आपल्याला लहानपणापासून शिकवले असतं की आपण सर्वात “ पुढे जायला पाहिजे “ आणि आपल्यासारख्या अचाट
लोकसंख्येच्या देशांमध्ये “ पुढे जाणं”  म्हणजे वर्गांमध्ये अभ्यासात पहिले येणे . पुढे जाणं म्हणजे कॉलेज कॅम्पस इंटरव्ह्यू
मध्ये सर्वात चांगली नोकरी पटकावणे ! आपल्या टिपिकल मराठी मध्यमवर्गीय व्याख्येमध्ये पुढे जाणं म्हणजे अभ्यासात पुढे
जाणे असत. आपल्याला चित्रकला आवडत असेल, आपल्याला खेळ आवडत असतील किंवा आपल्याला समाजसेवा  
आवडत असेल तरी तरी या क्षेत्रांमध्ये तुम्ही कितीही मेहनत केलीत तरी समाज तुम्हाला यशस्वी समजत नाही.
आणि आपल्या देशांमध्ये काही प्रमाणात अशा क्षेत्रांमध्ये पुढे जाणं थोड कठीण असतं असाही एक समज आहे .
लोकसंख्येमुळे स्पर्धा खूप आहे ,खेळ कला यासाठी चांगल्या सोयी सर्व ठिकाणी नाहीत त्यामुळे सर्वच क्रिकेटवेडी मुले
सचिन तेंडुलकर बनू शकत नाहीत, उत्तम बॅडमिंटन खेळणाऱ्या  सर्व मुली सायना नेहवाल /सिंधू बनत नाहीत अथवा सुंदर चित्र
काढणारी सर्व मुले एम एफ हुसेन बनू शकत नाहीत. यात काही अंशी तथ्य आहेच पण म्हणून  ज्यांना कला आणि क्रीडा
क्षेत्रांमध्ये गती  आहे त्या सर्वांनी आपापली स्वप्ने गुंडाळून ठेवून इंजिनिअर /डॉक्टर/ वकील किंवा सीए व्हावे असेही
 नाही.



करियर निवडताना असा विचार करा की तुम्हाला रोज आठ ते दहा तास एखादे काम करायचय आणि  आणि पैसा यामध्ये
महत्त्वाचा नाहीच आहे.  काय बरं तुम्हाला  आवडेल तुम्हाला करायला? मनाविरुद्ध आठवड्याचे ४० तास काम करून सुखी
रहाल ? क्रिकेट चे उदाहरण घेतले तर आज वर म्हटल्याप्रमाणे सगळेच सचिन नाही झाले तरी स्थानिक आणि राष्ट्रीय
पातळीवर विविध स्पर्धा आहेतच ! आय पी एल सारख्या स्पर्धेत खेळणारे सगळेच भारतीय संघात खेळत नसतील पण
बक्कळ पैसे मात्र नक्कीच मिळवतात . स्पोर्ट्स कोट्यामधून रेल्वे,राज्य आणि केंद्र सरकार,विविध बँका इत्यादी मध्ये
अजूनही नोकऱ्या मिळतात .

अभिनयाची आवड असेल तर सध्या असलेले भरपूर टी व्ही चॅनेल्स वरच्या  डेली सोप्स आणि नवीन आलेले वेब सिरीज
/OTT ऍप्स मध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत .अगदी सुपरस्टार झाला नाहीत तरी घर चालविण्यापुरते पैसे नक्की मिळवू
शकाल .

सामाजिक सेवेची आवड असेल आणि लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी अभ्यास आणि अफाट वाचन करण्याची
तयारी असेल तर राज्य आणि केंद्र सरकारात अधिकारी बनून टेचात समाजसेवा करू शकता ! किंवा  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ
सोशल सायन्सेस सारखे कोर्स करून विविध आघाडीच्या समाज सेवी संस्थांमध्ये पगारी समाजसेवा सुद्धा करू शकता .

सांगायचा मुद्दा हा की नवीन अर्थव्यवस्थेमध्ये संधी भरपूर उपलब्ध आहेत आणि एखाद्या गोष्टीची तुम्हाला खूप आवड असेल
तर त्या क्षेत्रात मेहनत करून करियर नक्की करू शकता !

२. उद्योजक ,व्यावसायिक की नोकरी ?

साधारण वयाच्या १६ व्या वर्षापर्यँत म्हणजे दहावी उत्तीर्ण होई पर्यंत , प्रत्येक मुलाचे अथवा मुलीचे व्यक्तिमत्व कसे आहे
याबद्दल त्यांना स्वतःला आणि पालकांना थोडीफार कल्पना आली असते . म्हणजे मुलाला स्वतः हुन काही गोष्टी पुढाकार
घेऊन ,नेतृत्व घेऊन करायला आवडतात की तो एक उत्तम टीम मेम्बर आहे हे साधारणतः समजते . तसच व्यवसाय करीत
असताना उद्योजकांना अनिश्चितता नेहमीच साथ करीत असते .आपल्या मुलाला अथवा मुलीला अनिश्तिततेशी सामना
करता येतो का ?जरा अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न अथवा प्रकल्प शिक्षकांनी करायला सांगितलं तर ती त्यात गडबडून
जाते की आपणहून अवांतर वाचन करून /इतर विद्यार्थी/पालक/शिक्षक वगैरेंशी चर्चा करून तो प्रश्न सोडवते ?




सतत नवीन गोष्टी शिकण्याची ,नवीन मित्र जोडायची आवड आहे का ? वृत्तपत्रातील बातम्या वाचणे ,अर्थव्यवस्थेवर चर्चा
करणे आवडते का ?व्यक्तिमत्व बंडखोर आहे की “कन्फर्मिस्ट” आहे ? या सर्व मुद्द्यांचा विचार करून मुलीला व्यावसायिक
( CA ,वकील इत्यादी ) होणे जमेल की उद्योजक होणे झेपेल याचे साधारण ठोकताळे बांधता येतील . अर्थात उद्योजक
होण्याचा हमखास यशस्वी फॉर्मुला नाही आणि शालेय जीवनात धडाडी दाखवणारा प्रत्येक मुलगा पुढे उद्योजक होईल
आणि एखादा अबोल आणि आज्ञाधारक मुलगा आयुष्यभर नोकरीच करेल असेही नाही . पण जस म्हणतात ना की
“बाळाचे पाय पाळण्यात दिसतात “, तसंच काहीस आपल्याला एकंदरीत स्वभावावरून स्वयं रोजगार की नोकरी हे ठरविता
येईल .

जर मुळात कुणाच्या हाता खाली काम करण्याचे स्वभावात नसेल तर मनाविरुद्ध नोकरी करून रोज बॉसशी भांडण्यापेक्षा
स्वयं रोजगाराचा विचार करावा हे उत्तम . परंतु नोकरी मध्ये मिळणारे स्थैर्य ,महिन्याच्या म्हणायला नक्कीच मिळणारा पगार
हे सर्व उद्योग/व्यवसायात नसत .आपणच मेहनत करून आपला मार्ग शोधायचा असतो याची मानसिक तयारी ठेवली पाहिजे .

त्यामुळे दहावी/बारावी नन्तर नोकरी करायची नसेल आणि उद्योग धंदा करायचा असेल तर विद्यापीठीय शिक्षणाच्या
आणि पदव्या मिळविण्याचा भानगडीत न पडता ,कौशल्य विकास ,नवीन गोष्टी शिकणे ,प्रवास करणे,आजच्या जगात
समाजाला नक्की कसली गरज आहे याचा मार्केट सर्व्हे करणे यास महत्व देता येईल . आज इंजिनियर आणि एम बी ए ज
पैशाला पासरी मिळतील पण वेळेला लागला तर प्लम्बर आणि इलेक्ट्रिशियन मिळत नाही ! वाढत्या लोकसंख्येला आणि
फास्ट जीवनशैलीला साजसें व्यवसाय केलेत तर पैसा आपसूक मिळेल . आज शहरात उत्तम आणि घरघुती चव देणारे पोळी
भाजी केंद्र /मुलांची योग्य काळजी घेणारे हायजिनिक पाळणाघर जरी सुरु केलेत तरी खोऱ्याने पैसे मिळू शकतील कारण
आजच्या समाजाच्या या गरजा आहेत आणि गरजेचे पोटेन्शिअल जो टॅप करेल तो खरा सिकंदर .

आज मोठ्या शहरातला वडा पाव वाला सहज महिन्याला ५०-६० हजार रुपये कमवतो पण इंजिनियर झालेली मुलं
१० हजारावर नोकऱ्या करतात . श्रम प्रतिष्ठा जपायला शिकलात तर कुठलंच काम हलकं नाही . पालकांनी सुद्धा अमुक
काम वाईट आणि तमुक काम चांगलं हा दुराग्रह सोडायला हवा .

व्यावसायिक शिक्षण घ्यायचे असेल तर वकिल,CA ,टॅक्स कन्सल्टन्ट , अक्चुअरीज ,आर्किटेक्चर असे अनेक पर्याय आहेत .
ज्यात तुम्ही स्वतः ची प्रॅक्टिस सुरु करू शकता .त्या त्या विषयात तद्न्य व्हा .

३. जीवनशैली कशी हवी ?

मी आज जेव्हा मुलांशी बोलतो तेव्हा त्यांना हा प्रश्न जरूर विचारतो . “सुखी ,समाधानी आयुष्याची “ त्यांची व्याख्या काय ?
कारण प्रत्येक नोकरी /व्यवसाय /उद्योग यांचे एक लाइफस्टाइल पोटेन्शियल असते .म्हणजे उदाहरणार्थ सरकारी नोकरी
केलीत आणि IAS वगैरे झालात  तर सरकार तर्फे नोकरीत असेपर्यंत घर मिळेल ,एखादी सरकारी गाडी आणि ड्रायव्हर
पण मिळेल . पण तुमची स्वप्न ६० लाखाची मर्सिडीज विकत  घेण्याची आणि विमानाच्या बिझनेस क्लास ने दर सुट्टीत
स्वित्झर्लण्ड ला जाण्याची असतील तर सातवा काय अगदी विसावा वेतन आयोग आला तरी तुमच्या सरकारी पगारात ते
शक्य नाही . अर्थात यात हे गृहीत धरलय की तुम्ही भ्रष्टाचार करणार नाही :-) पण याच नोकरी मध्ये मिळणारी पॉवर /प्रतिष्ठा
आणि प्रत्यक्ष लोकांचे जीवन सकारात्मक पणे बदलण्याची संधी आणि अनुभव खाजगी नोकरीत मिळणार नाही !




त्यामुळे तुम्हाला नक्की कसं जगायचंय हे ठरवा ! कुणाला शिक्षक व्हायचे असेल आणि मुलांना शिकविण्यात आनंद
मिळत असेल तर अपेक्षेएवढा पगार न मिळता सुद्धा त्यात आपला आनंद मानायची तयारी असेल तर तुम्ही निर्वाण
अवस्थेला पोहोचलात समजा :-)

याउलट तुम्ही अति उच्च शिक्षण घेऊन खाजगी बहुराष्ट्रीय कम्पनी मध्ये CEO बनलात आणि तुम्हाला गावातील शांत
जीवनशैली जगायची असेल तर ते शक्य नाही हेही तेव्हढंच खरं ! तिकडे पैसे भरपूर मिळतील पण वेळ नाही मिळणार !
वैद्यकीय क्षेत्रात गेलात तर समाजात मान ,चांगला पैसा मिळेल पण रात्री बेरात्री पेशन्ट ला इमर्जन्सी आली तर त्याच्या
वर उपचार करायला सज्ज व्हावंच लागेल हे पण लक्षात घ्या ! बोटीवर नोकरी करायला गेलात तर सहा सहा महिने समुद्रावर
कुटुंबापासून दूर रहावे लागते याचीही तयारी ठेवा .

फिल्म स्टार व्हायचे असेल तर आपल्या आरोग्याची,दिसण्याची फार काळजी घ्यावी लागते आणि वजन वाढू नये म्हणून
जिभेवर सुद्धा कंट्रोल ठेवावा लागतो ,फिटनेस रुटीन पाळावे लागते . पडद्यावर ग्लॅमरस दिसणारे तारे वैयक्तिक आयुष्यात
मात्र या क्षेत्रातील स्पर्धेमुळे सदैव तणावाखाली आणि असुरक्षित असतात .तो स्ट्रेस आपल्याला जमेल का याचाही विचार
करा .

त्यामुळे आपल्याला काय आणि कस जगायचंय हे प्रथम ठरवा . प्रत्येक व्यवसाय,नोकरी ,धंदा आपल्यासोबत काही
युनिक चॅलेंजेस घेऊन येतो त्याबद्दल त्या त्या क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा करा .केवळ ग्लॅमर ला भुलून करियर निवडू नका .





या जगात यशस्वीतेची व्याख्या म्हणजे भरपूर पैसे कमावणारा आणि त्यामुळे समाजात कॉलर टाईट असणारा हीच नसून
आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी जे करियर तुम्हाला योग्य वाटेल त्याकडे जा . कुणाला नकोही असते मर्सिडीज
आणि असतातही काही जण समाधानी रिक्षाने जाऊन येऊन . पैशाचे गुलाम होऊ नका .आपली जीवनशैली आपण निवडा .

आणि पैसाच जर महत्वाचा असेल तर “ सोमवार ते शुक्रवार मनाविरुद्ध आवडत नसणारे काम करीन पण पैसे कमवून
विकेंड ला आणि सुट्टीत खर्च करीन “ असा मध्यममार्ग घेणारे सुद्धा बरेच जण आहेत .पण मग त्याला “करियर” करणं न
म्हणता “अडजस्टमेन्ट” असं म्हणता येईल . आठवड्याचे पाच दिवस दुःखी राहून विकेंड चे दोन दिवस सुखात जगायचं की
आवडत काम करून नेहमीच आनंदी रहायचं ?तुमचं तुम्ही ठरवा

४. देशात रहायचे की परदेशात

जीवनशैली आणि आवड यांची सांगड घालणारा हा एक अजून मुद्दा महत्वाचा  आहे .काही विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्याचे
आणि तिकडेच नोकरी करण्याचे आकर्षण असते . पण परदेशात सेटल होणे आज पूर्वीसारखे सोपे राहिले नाहीये .
परदेशांत शिक्षणासाठी जास्त खर्च येतो आणि जर तिकडेच परकीय चलनात पगार देणारी नोकरी मिळाली नाही तर भारतात
परत येऊन मिळणाऱ्या पगारात घेतलेले एज्युकेशन लोन फेडणे महाकर्मकठीण काम असते .(अधिक माहितीसाठी या
विषयावरचा माझा लेख वाचण्यासाठी इकडे क्लिक करा ) तसेच परदेशातून अगदीच काही विशेष पात्रता कमावली नाहीत
अथवा नामवंतविद्यापीठातून पदवी घेतली नाहीत तर इकडे केवळ “फॉरेन रिटर्न्ड” म्हणून कोणीही तुम्हाला नोकरीसाठी
विशेष पायघड्या घालत नाहीत . परदेशातील सर्वसामान्य विद्यापीठाची पदवी आणि इकडच्या मुंबई किंवा पुणे विद्यापीठाची
पदवी समकक्षच मानली जाते . उलट काही व्यवसायात जसे की वैद्यकीय व्यवसायात बाहेरच्या देशातून मिळवलेली
वैद्यकीय पदवी भारतात तशीच्या तशी चालत सुद्धा नाही ! इकडे मेडिकल कौंसिल ची कठीण परीक्षा देऊनच भारतात
वैद्यकीय व्यवसायाचा परवाना मिळतो . याचा पण विचार करा .




गल्लो गल्ली बोकाळलेल्या कमिशन बेसिस वर विद्यार्थी जाळ्यात ओढणाऱ्या फॉरेन एज्युकेशन कन्सल्टंट्स च्या नादी लागून
उगाचच UK /US /ऑस्ट्रेलिया /न्यूझीलण्ड आदी देशातील सुमार कॉलेजेस मध्ये प्रवेश घेऊन , ५०-६० लाख रुपये घालवून
एम एस अथवा एम बी ए च्या पदव्यांची भेंडोळी घेऊन परत आलात तर इकडे कुणीही ढुंकून विचारत नाही .
पालकांना मात्र आपली बछडी फॉरेन ला शिकतात म्हणून कोण कौतुक आणि अभिमान वाटतो . पण ते देश शिक्षण झाले
की विद्यार्थ्यांना वर्क परमिट आणि  नागरिकत्व द्यायला सहज तयार नसतात आणि म्हणून विद्यार्थ्यांना इकडे परत यावे लागते
आणि मग बेकारीचा सामना करत करत खूप भ्रमनिरास होतो .कशासाठी एव्हढा अट्टाहास ?

आता याउलट गोष्ट म्हणजे काही विशिष्ठ करियर्स ची देशात असलेली मर्यादित उपलब्धता ! उदाहरणार्थ ,आज तुम्हाला
मूलभूत विज्ञान ,अणू विज्ञान ,अंतरिक्ष विज्ञान किंवा अगदी डेअरी टेक्नॉलॉजी वगैरे क्षेत्रांमध्ये नवीन संशोधन करायचे असेल
तर देशात फार मर्यादित संधी आहेत . अजूनही आपण आय टी मध्ये वगैरे सुद्धा लेबर जॉब्स करतो ,इनोव्हेशन नाही .  
शिकण्यासाठी परदेशा चाच पर्याय उरतो . मग यासाठी असणाऱ्या प्रवेश परीक्षा ,लागणारी  रेफरन्स लेटर्स ,स्टेटमेंट
ऑफ पर्पज वगैरेची माहिती घ्या .

सारांश :

मागच्या पिढीने जास्त विचार न करता पटापट मिळेल ते शिकून मिळेल ती नोकरी पटकावली आणि आयुष्यभर
पाट्या टाकत निभावून नेले . पण त्यांच्या या मेहनत आणि त्यागामुळे आजच्या पिढीला किमान आर्थिक स्थैर्य आहे .
मग या पिढीने थोडी कॅल्क्युलेटेड रिस्क का घेऊ नये ? थोडी ट्रायल एरर का करून बघू नये ? वयाच्या सोळाव्या वर्षी
दहावी,अठराव्या वर्षी बारावी,एकविसाव्या वर्षी पदवी आणि मग नोकरी याच चक्रात का अडकावे ? वर नमूद केलेल्या
चार मुद्य्यांवर सखोल चर्चा करून ,कागदावर आपल्याला यातले काय आवडते ?काय जमेल ? कुठे रहायचे आहे
आणि कशी जीवनशैली जगायची आहे याचा एक आराखडा मुलांनी आणि पालकांनी एकत्र बसून बनवला आणि मग
त्या त्या क्षेत्रातील जाणत्या व्यक्तींशी बोलून करियरची डोळस निवड केली तर ?



लेख आवडला तर प्रतिक्रिया नक्की कळवा . आणि लेखकाच्या नावासकट शेअर नक्की करा :-)

( लेखातील सर्व इमेजेस गुगल इमेज सर्च वरून साभार आणि स्वामित्व हक्क त्या त्या वेबसाईट कडे सुरक्षित. )


- चिन्मय गवाणकर
वसई
chinmaygavankar@gmail.com

Monday, March 5, 2018

आधुनिक युगातील भारतीय "फॅरेडे" : डॉ.कौस्तव बॅनर्जी

पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता : ४ मार्च २०१८ : https://www.loksatta.com/vishesh-news/what-is-nanotechnology-1639796/



 आधुनिक युगातील भारतीय "फॅरेडे" : डॉ.कौस्तव बॅनर्जी


आजचे जग तंत्रयुग म्हणून ओळखले जाते. मोबाईल फोन , लॅपटॉप, रेडियो, टेलीव्हिजन, कार इत्यादी वस्तू ज्या काही वर्षांपूर्वी श्रीमंती समजल्या जायच्या त्या आज सहज मध्यमवर्गीय आणि काही प्रमाणात निम्न मध्यमवर्गीय घरांमध्ये सर्रास दिसतात . दिवसेंदिवस तंत्रज्ञानात प्रगती होतेय पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचे मूलभूत घटक असलेले विद्युत प्रवर्तक ( Inductor )  मात्र अजूनही दीडशेहून जास्त जुन्या काळातील तत्वावर चालतात ! विख्यात ब्रिटिश शास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांनी १८३१ साली केलेल्या संशोधनावरून आजही विद्युत प्रवर्तक  तयार केले होते.आपण शाळेत असताना विज्ञानातील विद्युतशास्त्रात जे ‘फॅरेडेचे नियम’ शिकलो तोच हा  विश्वविख्यात भौतिक शास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे

प्रथम आपण विद्युत प्रवर्तक  म्हणजे काय ते समजून घेऊ . हा व्होल्टेज दिल्यावर ( विद्युत प्रवाह सोडल्यावर ) गोलाकार कॉईलमध्ये चुंबकीय क्षेत्र तयार करतो .AC प्रवाह  जोडणी ( सर्किट )मध्ये आला तर विद्युतप्रवर्तक हा AC प्रवाह ब्रेक करतो व DC प्रवाह बाहेर सोडतो . ‘यांत्रिकी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते.’ या तत्त्वावर आधारलेली  पहिली ‘इंडक्शनमोटर’ ( विद्युत प्रवर्तक मोटर ) तयार केली फॅरेडे ने . परिणामी कालांतराने या उपकरणाचा वापर करून पंखा, शिवणयंत्र, चारचाकी, आगगाडी, विमान ही प्रगत साधने तयार केली.परंतु हे सर्व विद्युत प्रवर्तक धातूचे बनलेले असून एका मर्यादेपलीकडे त्यांचा आकार कमी करणे आज पर्यंत शक्य झाले नव्हते.त्यांच्या या मर्यादेमुळे सध्याच्या "कनेक्टेड" युगात "इंटरनेट ऑफ थिंग्स"  ( म्हणजे जगभरातील छोट्या छोट्या वस्तूंमधून निर्माण होणारे सिग्नल्स गोळा करून त्यावर डेटा अनालिटिक्स करण्यासाठी ) चा जास्तीत जास्त वापर छोट्या छोट्या वस्तूंमध्ये करण्यास मर्यादा होत्या  . हा मूलभूत प्रश्न सुटला तर इंटरनेट ऑफ थिंग्स द्वारे २०२० सालापर्यंत जगभरातील ५० अब्ज वस्तू एकमेकांशी जोडल्या जातील आणि मानवाला जीवन सुखकर बनविण्याच्या नवीन शक्यता उपलब्ध होतील

सर्व विद्युत प्रवर्तक चुंबकीय आणि गतिमान उपयोजन ( Magnetic and Kinetic Inductance )  उत्पन्न करतात परंतु सामान्य धातूच्या कंडक्टरमध्ये, गतिमान  उपयोजन नगण्य स्वरूपात असते . गतिमान उपयोजनाचे महत्व असे की त्याचे कार्य विद्युत प्रवर्तकाच्या क्षेत्रफळावर अवलंबून नसते. गतिमान उपयोजन विद्युत प्रवाहातील अनियमितता मर्यादित करते त्यामुळे इलेक्ट्रॉन्स ची गती नियमित रहाते आणि इलेक्ट्रॉन्स सुद्धा न्यूटनच्या जडत्वाच्या नियमानुसार बदलाला विरोध करतात . उलट सध्याच्या धातूच्या विद्युत प्रवर्तकांमध्ये वापरले जाणारे चुंबकीय उपयोजन असते ! चुंबकीय उपयोजनासाठी किमान क्षेत्रफळाची आवश्यकता असते .त्यामुळे आपल्याला माहीतच आहे की " मूर्स लॉ "  नुसार सर्किट बोर्डावरील ट्रांसिस्टर चिप्स दिवसेंदिवस छोट्या होत गेल्या पण विद्युत प्रवर्तकांचा आकार लहान करण्यास चुंबकीय क्षेत्राच्या किमान क्षेत्रफळाच्या गरजेमुळे मर्यादा आल्या . त्यामुळे तांब्याची तार गुंडाळलेला धातूचा विद्युत प्रवर्तक ,इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या अजून लहान आकाराची होण्यात प्रमुख अडथळा होता

भौतिकशास्त्राला हे बरीच वर्ष माहित आहे परंतु याचा उपयोग फारसा कोणी आजवर करू शकले नाही .परंतु भारतीयांसाठी एक अभिमानाची गोष्ट अशी की नुकताच या क्षेत्रातील एक क्रांतिकारी शोध एका मूळच्या भारतीय ( आणि पक्क्या मुंबईकर ) पण सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या एका तरुण प्राध्यापकाने लावलाय ! सांता बार्बरा -कॅलिफोर्निया ( UCSB ) येथील विद्यापीठातील इलेक्ट्रिकल व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक डॉ .कौस्तव बॅनर्जी आणि त्यांच्या टीमने आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सच्या या मूलभूत घटकांची पुनर्रचना करण्याची सूक्ष्मातीत सामग्री-आधारित ( Nanomaterials Based ) पध्दत अवलंबली आहे. नेचर इलॅक्ट्रॉनिक जर्नलमध्ये नुकताच हा शोध प्रसिद्ध झाला आणि सम्पूर्ण जगाने याची दखल घेतली आहे


डॉ .बॅनर्जी आणि त्यांच्या यूसीएसबी टीमचे सदस्य जियाहाओ कांग ,जुंकाय ज्यांग ,शुजून शे ,जे वान चू ,वे लियू   यांनी आपल्या नैनोइलेक्ट्रॉनिक्स  संशोधन प्रयोगशाळेत हा शोध लावला . त्यांनी जपानमधील ल शिबाऊरा  इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि चीनमधील शांघाय जिओ टॉंग युनिव्हर्सिटी बरोबर काम केले होते. धातूच्या विद्युत प्रवर्तकांमध्ये जर गतिमान उपयोजन नगण्य असेल आणि आपल्याला जर याचाच उपयोग जास्त करून विद्युत प्रवर्तकाचा आकार छोटा करायचा असेल तर आपण धातूला दुसऱ्या घटकाचा पर्याय का शोधू नये या प्रश्नाभोवती त्याचे संशोधन सुरु होते

डॉ. बॅनर्जी हे आपले मुंबईकर . सेंट.झेवियर्स महाविद्यालयातून त्यांचे पदवी पर्यंत शिक्षण झाले .नव्वद च्या दशकात उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले आणि १९९९ साली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग(भौतिकशास्त्र आणि सामग्री विज्ञानमधील उपविषया सकट ) मध्ये  युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया ,बर्कली येथून पी.एच डी प्राप्त केली.आज जगभरात ते   नॅनोइलेक्ट्रोनिक्सच्या अग्रगण्य संशोधकांपैकी एक गणले जातात . सध्या ते इलेक्ट्रिकल व संगणक अभियांत्रिकीचे प्राध्यापक आहेत आणि यूसी सांता बारबरा येथे नैनोइलेक्ट्रोनिक्स रिसर्च लॅबचे संचालक आहेत. त्याचे सध्याचे संशोधन पुढील पिढीतीलग्रीन  इलेक्ट्रॉनिक्स, फोटोनिक्स, आणि बायोइलेक्ट्रोनिक्ससाठी ग्राफिन आणि इतर 2 डी सामग्री यासारख्या भौतिकशास्त्र, तंत्रज्ञान आणि कमी-आयामी सूक्ष्मातीत द्रव्यांच्या उपकरणावर केंद्रित आहे





प्रोफेसर बॅनर्जी यांनी नॅनोमोटेरियल्स आणि कमी-आयामी भौतिकीपासून ते इलेक्ट्रॉनिक  उपकरणे , सर्किट्स, आणि चिप-डिटेक्शन पद्धती आणि आर्किटेक्चर्सपर्यंत वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून विविध पर्यायांचा अभ्यास करून ऊर्जा-कार्यक्षम इलेक्ट्रॉनिक्सच्या सीमेपर्यंत विस्तार करण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याच्या कल्पना आणि आविष्काराने उल्लेखनीय सामाजिक आणि आर्थिक परिणामांसह जगभरातील शोध आणि विकास प्रयत्नांना चालना देण्यासाठी एक निर्णायक भूमिका बजावली आहे. 2015 मध्ये, इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर (IEEE ) यांनी त्यांना "त्रि -मितीय  (3D) आयसी तंत्रज्ञानाच्या मागे प्रमुख दृष्टिकोनांपैकी एक म्हणून म्हटले आहे ज्याने मूरच्या नियमांपासून सतत स्केलिंग आणि एकात्मतेसाठी अर्धसंवाहक उद्योगाद्वारे काम केले आहे, तसेच आयसी डिझाइन उद्योगात वापरल्या जाणाऱ्या थर्मल-जागृत डिझाईन पद्धती आणि साधनांच्या मागे अग्रगण्य आणि तांत्रिक क्षेत्र पुरस्कार - द कियो तोमियासु पुरस्कार, या संस्थेच्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक म्हणून त्यांचे योगदान ओळखले जात

प्राध्यापक  बॅनर्जी यांच्या रिसर्च ग्रुपने सूक्ष्मातीत ट्रांसिस्टर्स , इंटरकनेक्ट्स आणि सेन्सर्समध्ये वीज अपव्यय आणि इतर मूलभूत आव्हानांवर मात करण्यासाठी नॅनोमोटेरियल्सचा उपयोग केला आहे. यात जगातील सर्वात उंचावरील चॅनल टनेलिंग ट्रान्झिस्टरचा प्रात्यक्षिक समाविष्ट आहे जो कि 0.1V वर स्विच करतो, ज्यामुळे ऊर्जा वापरामध्ये  होते 90% पेक्षा कमी घट झाली .हेही संशोधन नेचर मासिकात २०१५ साली प्रसिद्ध झाले होते

प्राध्यापक बॅनर्जी यांचे संशोधन व्यावसायिक जर्नल्समध्ये सुमारे 300 पेपरमध्ये नोंदवले गेले आहे, जसे की नेचर, नेचर इलेक्ट्रॉनिक्स ,  नेचर मटेरिअल्स , नेचर नॅनोटेक्नॉलॉजी, नॅनो लेटर्स, एसीएस नॅनो, फिजिकल रिव्ह्यू एक्स आणि आयईईईच्या प्रोसिडिंग्स सारख्या अनेक उच्च-प्रभाव पत्रके; तसेच आयईडीएम ( IEDM ) , आयएसएससीसी ( ISSCC ) , व्हीएलएसआय सिम्प्झोअम, डीएसी (DAC ) , आयसीसीएडी ( ICCAD ) आणि आयआरपीएस ( IRPS ).  प्रोफेसर बॅनर्जी 2008 पासून आईईईई इलेक्ट्रॉन डिव्हायसेस सोसायटीचे एक डिस्टिंग्विश्ड लेक्चरर आहेत. त्यांनी 200 हुन अधिक आंतरराष्ट्रीय  व्याख्याने , परीसंवाद , ट्यूटोरियल्स दिली असून आणि जगभरातील असंख्य आंतरराष्ट्रीय परिषदान मध्ये सहभाग घेतला आहे . प्रोफेसर बॅनर्जी यांचे लेखन आणि संशोधन   नेचर न्यूज अँड व्ह्यूज, नेचर नॅनोटेक्नॉलॉजी रिसर्च हाइलाइटस, फिझिक्स टुडे, आयईई स्पेक्ट्रम, ईई टाइम्स, सायन्स डेली, आर ऍण्ड डी मॅगझिन, फिजिक्स वर्ल्ड, नॅशनल रेडियो, एनएसएफ,एनएई, जपानचे एनईडीओ आणि द इकॉनॉमिस्ट अश्या  असंख्य वैज्ञानिक आणि लोकप्रिय न्यूज मीडियामध्ये प्रसिद्द झालेले आहे .

प्रोफेसर बॅनर्जी आयईइई ( IEEE ), द अमेरिकन फिजिकल सोसायटी ( APS ) आणि अमेरिकन असोसिएशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स ( AAAS ) चे महत्वाचे  सदस्य ( Fellow ) आहेत. त्याच्या कल्पना आणि नवकल्पनांना प्रतिष्ठेच्या बेसेल पुरस्कारांसह 2011 मध्ये हंबोल्ट फाऊंडेशन, जर्मनी, नैनोइलेक्ट्रोनिक्सच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल  2013 मध्ये विज्ञान, 2D साहित्य आणि साधनांवरील त्याच्या संशोधनासाठी जपान सोसायटी ऑफ द प्रमोशन ऑफ सायन्स ( JSPS ) यांच्या तर्फे  फेलोशिप दिली गेली .

डॉ.बॅनर्जी यांच्या टीम ने एक नवीन प्रकारचा सर्पिल विद्युत प्रवर्तक तयार केला आहे ज्यामध्ये ग्राफिन  च्या एकाधिक स्तरांचा समावेश आहे. एकल स्तरीय ( सिंगल-लेयर) ग्राफिन एक रेखीय इलेक्ट्रॉनिक बँडसंरचना आणि एक तुलनेने अधिक  मोठे गति विश्रांती वेळ दर्शवितो जी पारंपरिक धातूच्या (जसे की पारंपरिक ऑन-चिप विद्युत प्रवर्तका मध्ये वापरले जाणारे तांबे ) ही वेळ   1 / 1000 ते 1/100 पिको सेकंद असू शकते ( एक पिकोसेकंद = एक सेकंड भागिले  १० वर १२ शून्य )  पण एकल स्तरीय ग्राफिन मध्ये खूपच विद्युत प्रतिकार ( Resistance ) असल्याने त्याचा विद्युत प्रवर्तकासाठी उपयोग करता येत नाही   

तथापि, हा  प्रश्न काही अंशी  बहुस्तरीय ग्राफिन वापरून सोडवता येतो  परंतु आंतरस्तरीय जोडांमुळे त्याचा गति विश्रांती वेळ अपुरा पडू शकते. डॉ.बॅनर्जी आणि टीम ने हा प्रश्न सुद्धा एक आव्हान म्हणून स्वीकारला आणि भौतिकशास्त्राला रसायन शास्त्राची जोड दिली ! संशोधकांनी ग्राफिन च्या स्तरांच्या मध्ये  ब्रोमीन अणूंचा समावेश केला. या प्रक्रियेला अंतर्वेशन (Intercalation )असे म्हणतात. या प्रक्रियेत बहुस्तरीय ग्राफिन चा केवळ प्रतिकारच कमी होतो असे नाही तर ग्राफीन च्या एकल स्तरीय गुणधर्माप्रमाणे आवश्यक तो गती विश्रांती वेळ साधता येतो

अश्या शोधावर आधारित हा क्रांतिकारक विद्युत प्रवर्तक एक तृतीयांश जागेत ,10-50 Ghz च्या श्रेणीत  काम करतो, पारंपारिक धातूच्या प्रवर्तकापेक्षा एक तृतीयांश जागेत मावतो तरीही दीड पट उपयोजन देतो ! हा नवीन प्रवर्तक अतिशय उच्च कार्यक्षमता प्रदान करतो .हा शोध लागण्यापूर्वी  उच्च प्रवर्तन ( Induction ) आणि कमी आकार हे एक चटकन जुळणारे संयोजन होते.ही तर फक्त सुरुवात असूनअंतर्वेशन प्रक्रियेची कार्यक्षमता वाढवून ग्राफिन ची घनता वाढविण्यासाठी आणि प्रवर्तकाचा आकार अजून कमी करण्यासाठी  भरपूर जागा उपलब्ध आहेत असा विश्वास संशोधकांना वाटतो

त्यामुळे आधुनिक युगाचा फॅरेडे म्हणून जग डॉ.कौस्तव बॅनर्जी यांना ओळखू तर लागेलच पण अजून  काही वर्षांनी जेव्हा हे संशोधन प्रत्यक्ष वापरण्यात येईल तेव्हा अजून लहान  झालेला मोबाईल आणि लॅपटॉपवापरताना त्यामध्ये आपल्या भारतीय संशोधकाचे प्रयत्न कारणीभूत आहेत या विचाराने प्रत्येक भारतीयाची  मान ताठ होणार हे नक्की !
-चिन्मय गवाणकर
           chinmaygavankar@gmail.com