The Gavankars

Tuesday, July 25, 2017

मराठी माणसाला काय येत नाही !!



मराठी भाषा दिन अथवा महाराष्ट्र दिन असला की काही टिपिकल मेसेजेस व्हाट्सअप वर फिरू लागतात.त्यातलाच एक मेसेज म्हणजे "मराठी माणसाला काय येते " ! थोर व्यक्तींची नावे घेऊन ,मराठी माणसाला हिंदवी स्वराज्य स्थापन करता येते / राज्यघटना लिहिता येते /मराठी माणसाला भारतीय असंतोषाचे जनक होता येते / मराठी महिलेला राष्ट्र्पती होता येते /मराठी क्रिकेटपटू विश्वविक्रमवीर होतो /मराठी माणसाला अमुक येते आणि तमुक येते ..वगैरे वगैरे लिहून "अभिमान आहे मराठी असल्याचा" ची फुशारकी मारली जाते .हे जे कोणी "थोर" असतात ते फक्त  "मराठी" म्हणून नव्हे तर आपल्या अंगभूत गुणांनी आणि परिश्रमाने मोठे झालेले असतात . पण आपण मात्र त्यांना फक्त "मराठी" लेबल चिकटवून फुशारक्या मारतो . 





ठीकाय ...आपल्या भाषेचा /राज्याचा /संस्कृतीचा /थोर महापुरुषांच्या कार्याचा अभिमान असणे यात वाईट काहीच नाही . पण हे सर्व करताना आजचा मराठी समाज कसा आहे याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे केवळ आपल्या गौरवशाली इतिहासाच्या रम्य कथांमध्ये रमणाऱ्या  आणि आपल्या वर्तमानाकडे दुर्लक्ष करणाऱ्या समाजाला उज्जवल भविष्य असूच शकत नाही . पुढे नमूद केलेल्या मुद्द्यांना काही सन्माननीय अपवाद नक्कीच आहेत .पण सदरचे निरीक्षण कॉर्पोरेट तसेच सामाजिक क्षेत्रातील दीड दशकाच्या स्वानुभवावरून नोंदवित आहे .यात कुठल्याही समाजाला बदनाम करण्याचा हेतू नसून केवळ एक आरसा दाखविणे आहे 

"मराठी माणसाला काय येत नाही " याबद्दल सुद्धा आता थोडी चर्चा करूया  :


१. आजच्या मराठी  तरुणाईला सहसा  प्रतिकात्मकतेच्या बाहेर पडून मूलभूत काम करणे जमत नाही :


आज महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यात  गावच्या नाक्यावर /एस टी स्टॅन्ड वर / चहा टपरी /तालमी वगैरे ठिकाणी तिशीतल्या  रिकामटेकड्या तरुणांच्या भरपूर टोळ्या दिसतात . कोणीतरी यावर एक सुंदर लेख लिहिला होता जो मला व्हाट्सअप वर आला होता.लेखकाचे नाव आठवत नाही . यांना दिवसभर टवाळक्या करीत  स्थानिक आणि अगदी इंटरनॅशनल राजकारण ,खेळ वगैरे वर चर्चा करणे फार आवडते . पण या चर्चातून काही विधायक कार्य करावे असे फार कमी जणांना वाटते .वर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवली ,चंद्रकोरीचा टिळा लावला आणि उठता बसता " जगदंब " किंव्वा "जय महाराष्ट्र" म्हटल्याने महाराज होता येत नाही .महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ वयाच्या १६ व्या वर्षी मूठभर मावळ्यांना घेऊन रोवली आणि आमचे हे तिशीतले घोडे  आज केवळ फॅशन म्हणून महाराजांचा वापर करतात .!




१० मराठी पोरं एकत्र जमली तर फार तर दही हंडी सुरु करतील किंव्वा एक गणपती बसवतील आळीत . पण मूलभूत सामाजिक कार्य करणारे / उद्योजकता विकास व्हावा म्हणून झटणारे तरुण फारच कमी . 

गावचा सरपंच /आमदार /सहकारी संस्थेचे संचालक वगैरे कोणी मोठे " झाड" पकडून रहायचं आणि फुशारकी मारायची हे यांचे जीवितकार्य ! राजकारणी माणसे धूर्तपणे गरज असे पर्यंत यांना वापरतात आणि मग खड्यासारखे बाजूला फेकतात .तो पर्यंत चाळीशी आली असते आणि हातात काही काम नसते ! ना कुठले कौशल्य शिकून झालेले असते जे यांचे पोट भरायला मदत करेल ! 

राजकारणात पडलेले तरुण सुद्धा "धंदा" काय करतात ? तर नगरपालिका /जिल्हा परिषदे मध्ये रस्ते आणि गटारांची बांधकाम कंत्राटे घेणे !यात यांचे नॉलेज असते शून्य पण कुठल्या साहेबाला कसे "पटवायचे" हे मात्र बरोबर समजते . हीच हुशारी इतर उद्योग धंद्यात मात्र दिसत नाही .


२. मराठी माणसाला धड  उद्योग  धंदा करता येत नाहीच पण कॉर्पोरेट क्षेत्रात मिळेल  ती नोकरी पत्करून अनुभव घेणे सुद्धा आवडत नाही ! 


काही सन्माननीय अपवाद सोडले तर मराठी माणसाला उद्योग धंदा करताच येत नाही .याची अनेक कारणं आहेत . सर्वात मोठे कारण म्हणजे मराठी माणसामध्ये असलेला "मोडेन पण वाकणार नाही " असा असलेला वृथा बाणा ! बिझनेस करताना थोडे फार लवचिक असावे लागते . गोड बोलून,डोक्यावर बर्फ ठेवून वागावे लागते . पण आम्ही मात्र "एक घाव दोन तुकडे" करणारे ! जे पटणार नाही त्यात फटकन बोलून मोकळे होणारे ! मग कुणी दुखावले /नाराज झाले तरी फिकीर नाही . हीच अडचण नोकरी बाबत ! इकडे आपल्या "पे डिग्री" चा वृथा अभिमान आडवा येतो  ! " आमचे आजोबा ब्रिटिश काळात फायनान्स ऑफिसर होते ! आम्ही इस्त्रीचा धंदा कसा काय करणार ! " किंवा  " अमुक तमुक संस्थानिकांना सुद्धा कर्ज देणारं आमचं घराणं ! .आहात कुठं ? आमचा बंडू नाही बुवा करणार ती "फालतू" ( ! ) १५ हज्जार देणारी नोकरी ! " ," पोरीला घरी बसवीन पण इव्हेंट मॅनेजमेंट कम्पनी मधली नोकरी करून देणार नाही ! रात्री बेरात्री घरी येईल ..लोक काय म्हणतील ! " ..असले संवाद आपण नेहमी ऐकले असतील ! या मध्ये मुले शिकून सुद्धा नुसती घरी बसतात . या उलट इतर राज्यातील तरुण पडेल ती नोकरी घेऊन लाख मोलाचा जीवनानुभव मिळवतात ! हळू हळू कॉर्पोरेट लॅडर चढतात ! योग्य वेळी कधी कधी आपला स्व-रोजगार सुद्धा शोधतात ! 

आयुष्यात कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली तर  माणूस खूप पुढे जाऊ शकतो .पण काही करायचेच नाही आणि व्यवस्थेला शिव्या द्यायच्या तर आपलेच नुकसान होते 


३. मराठी माणसाला "बिझनेस नेटवर्किंग " जमत नाही ! 


फेसबुक आणि व्हाट्सअँप वर पडीक असणारे तरुण त्या आभासी जगात रमतात !पण विविध क्षेत्रात काम करताना आपण ज्यांना भेटतो त्यांना आपल्या "नेटवर्क" मध्ये सामावून घेण्याची कला फार थोड्यांना जमते ! आजच्या जगात कोण कधी कसा उपयोगी पडेल आणि कोणाची आपल्याला करियर मध्ये अथवा अगदी वैयक्तिक आयुष्यात कधी मदत लागेल याचा नेम नसतो . पण भेटलेल्या माणसाच्या क्षेत्राबद्दल जुजबी माहिती करून घेणे ,असल्यास आपले विझिटिंग कार्ड एक्सचेंज करणे ,लिंक्डइन सारख्या प्रोफेशनल नेटवर्क वर त्यांना "ऍड" करणे ,वगैरे फार कमी तरुण करतात . विविध इंडस्ट्रीयल प्रदर्शनांना भेट देणे ,सध्या कुठल्या क्षेत्रात चलती आहे याचा अंदाज घेऊन एखाद्या कम्पनीची डिस्ट्रिब्युटरशीप घेऊन बघणे ,चार मित्र एकत्र येऊन एखादा पार्ट टाइम लघु उद्योग करून बघणे वगैरे मराठी तरुण अभावानेच करताना दिसतात . आपली "बिझनेस" ची उडी वडा पाव /पाव भाजी ची गाडी अथवा दिवाळी मध्ये होलसेल ने फटाके आणून रिटेल मध्ये विकणे याच्या पुढे जात नाही . 

होलसेल मार्केट मध्ये फिरणे,बिझनेस चे तंत्र समजून घेणे ,इतर समाजातील बिझनेस करणाऱ्यांशी चर्चा करणे हे केल्याशीवाय उद्योजकता विकास होणार  कसा ?

सॅटर्डे/संडे  क्लब ,मराठी उद्योग क्लब वगैरे प्रयत्न नक्कीच सुरु आहेत पण यातून फारसे  नवीन उद्योजक घडताना काही दिसत नाहीत हे पण तितकेच खरे .त्याच त्याच लोकांची कॉन्फरन्स रूम्स मध्ये भरणारी पिकनिक एव्हढेच या "मराठी बिझनेस  क्लब्स" चे आऊटपूट !


४. मराठी माणसाला एकमेकांना धरून पुढे जाणे जमत नाही .


आपल्या मराठी समाजात एकमेकांना पुढे जाण्यात मदत करण्याची वृत्ती फारशी नाहीच . आपला समाज "individual excellence " च्या मागे धावणारा आहे . याउलट गुजराती /मारवाडी/उत्तर भारतीय/दक्षिण भारतीय ..कुठलाही समाज घ्या ." आपल्या " लोकांना नोकरी /उद्योगात मदत करून "समाज" म्हणून उन्नती करून घेण्याची वृत्ती दिसते . एक उत्तर भारतीय  मुंबई मध्ये आला की गावाकडून १० लोकांना घेऊन येतो आणि आपल्या खोलीत राहायला देतो .एखाद्या बँकेमधला दक्षिण भारतीय उच्च अधिकारी आपल्या टीम मध्ये प्रोमोशन्स चा विचार करताना सर्व प्रथम "आपल्या" माणसांना प्राधान्य देतो . एखादा गुजराती शेठ कच्छ च्या छोट्याश्या गावातून आपल्या लांबच्या नात्यामधल्या होतकरू मुलाला मुंबई ला आणून आपल्या धंद्याच्या  सर्व खाचा खोचा शिकवतो आणि तोच मुलगा पुढे जाऊन स्वतः चा धंदा काढून करोडपती होतो .आम्ही मात्र फक्त पदव्या घेऊन बॅंकेतली /आय टी कम्पनीमधली  नोकरी पकडतो आणि बाकी मराठी लोक गेले तेल लावत म्हणून आयुष्य आपल्या कुटुंबापुरते मर्यादित जगतो .

आपले ज्ञान शेअर करावे ,कुणाला तरी "मेंटरींग" करावे असे आपल्या मराठी बॉसेस ना /उद्योगपतींना वाटतच नसावे .



यात अजून एक प्रकार म्हणजे नको तो तत्वनिष्ठपणा ! आपल्याला जास्त भीती असते की मी जर मराठी माणसाला पुढे केले तर लोक मला पक्षपाती म्हणतील ! हे जे कोण "लोक " असतात ते कुणालाच कधीच दिसत नाहीत बरं  का ! .पण प्रत्येक गोष्टीत "लोक काय म्हणतील " असतंच ! परंतु जर आपल्या समोर पूर्णतः सारख्या गुणवत्तेचे दोन उमेदवार असतील आणि आपल्याला त्यातून एकच निवडता येणार असेल तर तो एक उमेदवार मराठी असला तर पक्षपात कसा ? पण माझ्या अनुभवात कित्येक असे प्रसंग पहिले आहेत की  मराठी मॅनेजर्स /बॉसेस या "पक्षपाती" शिक्क्याला घाबरून लायकी असताना सुद्धा मुद्दाम मराठी टीम मेंबर ला प्रमोशन देत नाहीत. इतर बॉसेस मात्र आपल्या बरोबर आपल्या समाजाच्या लोकांना कॉर्पोरेट लॅडर वर घेऊन पुढे जातात .




५. मराठी माणसाला आपल्या क्षेत्रात सदैव अद्ययावत रहाणे जमत नाही आणि आलेल्या संधीचा फायदा घेणे जमत नाही 


सध्या जग इतकं बदलतंय की आजचे ज्ञान उद्या कालबाह्य होतंय . पण मराठी समाजात अजूनही "एकदा नोकरीला चिकटलो की रिटायर होईपर्यंत आजू बाजूला बघायचं नाही की नवीन काही शिकायचं नाही" ही वृत्ती दिसते .एव्हढंच काय तर मुंबई,पुण्याच्या बाहेर जायचं नाही म्हणून प्रोमोशन्स नाकारणारे सुद्धा आहेत ! नवीन काही शिकायचं म्हटलं तर कपाळावर आठ्या येतात . कम्पनीचा नवीन प्लांट उत्तराखंड ला सुरु होतोय आणि तिकडे प्रमोशन घेऊन जाण्यापेक्षा इकडेच दुय्यम काम करायचे आणि मग कम्पनीने तुमची गरज नाही म्हणून काढून टाकले की "आमच्यावर अन्याय झाला" म्हणून गळा काढायचा हे नेहमीचे .तीच संधी इतर समाजाचे लोक घेतात आणि भर भर वर चढतात . आम्हाला मुंबई ,पुणे,फार तर नागपूर चालते आणि त्या नन्तर डायरेक्ट् अमेरिका लागते . भोपाळ /पंतनगर /विशाखापट्टणम /गुवाहाटी/चेन्नई वगैरे नाही जाणार आम्ही ! 

आईन्स्टाईन ने म्हटले आहे की ज्या दिवशी तुम्ही नवीन गोष्टी शिकायच्या थांबवलं त्या दिवशी तुमची मृत्यूची वेळ जवळ येईल !






नवीन शिकण्याची वृत्ती आपल्या बहुतांश मराठी मुलांमध्ये तर अजिबात नाही . नेहमीच्या कामा व्यतिरिक्त एखादे वेगळे काम आले तर मराठी माणूस "हे माझे काम नाही ,मला याचा पगार मिळत नाही " म्हणून बाजूला होतो . उलट इतर समाजाचे तरुण आपल्या कामाव्यतिरिक्त इतर कौशल्ये कशी शिकायला मिळतील याचा नेहमी विचार करीत असतात . 

मराठी तरुणांनी या मुद्यांचा जरूर विचार करावा !हा लेख पटला /आवडला तर कृपया लेखकाच्या नावासकट आणि या ब्लॉग च्या लिंक सकट शेअर करा .आपल्या प्रतिक्रिया खालील दिलेल्या ईमेल वर पाठवा .

चिन्मय गवाणकर ,वसई 

(लेखातील सर्व ग्राफिक्स : इंटरनेट वरून गुगल इमेज सर्च मधून साभार .स्वामित्वहक्क असल्यास त्या त्या वेबसाईटचे राखीव . )

Sunday, July 16, 2017

"करोड रुपयांच्या सॅलरी पॅकेजेस " चे सत्य !!


 पूर्वप्रसिद्धी :  लोकसत्ता : लोकरंग पुरवणी : १६ -०७-२०१७ ( http://www.loksatta.com/lekha-news/article-show-truth-about-highest-salary-package-in-multinational-companies-1512435/


आय आय टी आणि आय आय एम च्या कॅम्पस इंटरव्ह्यू मधून तिकडच्या विद्यार्थ्यांना अमेरिकेत काही कम्पन्यांकडून "ऑफर " झालेल्या गलेलठ्ठ  पगाराच्या च्या बातम्या आपण सर्वानीच वाचल्या असतील .आपल्या वर्तमानपत्रांना सुद्धा अश्या बातम्यांना मीठ-मसाला लावून देण्यात मज्जा वाटते ."२२ वर्षाच्या इंजिनियरला मायक्रोसॉफ्ट/उबर /गुगल /अमक्या तमक्या कम्पनीची सव्वा कोटी वार्षिक पगाराची ऑफर " /"आय आय एम अहमदाबाद च्या मुलीला न्यू यॉर्क मध्ये दीड कोटीचे पॅकेज " अश्या बातम्या हल्ली नित्याच्या झाल्या आहेत .अमेरिकन डॉलर मध्ये असलेल्या पॅकेज ला खूप सुलभपणे ७० ने गुणून भारतीय रुपयात डोळे विस्फारणारे आकडे छापून "सनसनी " निर्माण करणे हा मीडिया चा आवडता धंदा आहे . म्हणून आपण या लेखात आज या सर्व प्रकारचे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत . 



( फोटो : टाइम्स ऑफ इंडिया च्या पब्लिक वेबसाईट वरून साभार.सर्व हक्क टाइम्स ग्रुप कडेच राखीव )

या बातम्यांचा परिणाम विशेषतः म्हणून समाजातील दोन वर्गावर होतो ,ते म्हणजे १ . इंजिनियरिंग आणि एम बी ए करणारे /करण्यास इच्छुक असणारे विद्यार्थी आणि  २. त्यांचे पालक ! या दोन वर्गांना साधारणपणे खालील तीन प्रकारात विभागता येईल : 

प्रकार एक : भारावलेले पालक आणि त्यांचे भांबावलेले पाल्य  : 

आपल्या मुलाची अथवा मुलीची बौद्धिक क्षमता / मेहनत करण्याची तयारी /आधी मिळालेले गुण /शिक्षणासाठी उपलब्ध असणारा पैसा असल्या कुठल्याही गोष्टींचा विचार न करता या प्रकारातील पालक "सव्वा कोटी पगार आणि कॅलिफोर्निया मध्ये नोकरी " हे स्वप्न आपल्या मुलांवर लादतात आणि मग सुरु होतो एक संघर्ष ! आय आय टी JEE /आय आय एम च्या CAT साठी महागडे क्लास लावणे /मुलाचे खेळ /मित्र मैत्रिणी सगळं बंद करून त्या "बैला" ला घाण्याला जुंपणे सुरु होते आणि जर ऍडमिशन नाही मिळाली तर मग अक्खे घर सुतकात बुडते ! 

प्रकार दोन : इंजिनियर /एम बी ए होऊन ,नोकरी मिळून सुद्धा "करोड रुपया चे पॅकेज न मिळाल्याने " भ्रमनिरास झालेले दुःखी पालक त्यांचे  पाल्य :

हा प्रकार अजून डेंजरस ! कारण घासून घासून अभ्यास करून ,चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवून,कॅम्पस इंटरव्हू मधून यांना वार्षिक १०-१२ लाखाच्या पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या तरी यांना आपला "पेला अजून अर्धा" आहे असे फिलिंग येते ..कारण कॉलेज मधल्या एका कोणाला तरी मिळालेली तथाकथित "करोड" रुपयाची ( !! ) अमेरिकन ऑफर  ! म्हणजे मिळालेल्या नोकरी चा आनंद न घेता यांचे घर सुद्धा सुतक साजरे करते ! 

म्हणून आपण पहाणार आहोत या "करोड रुपयांच्या पॅकेजेस " चे सत्य :


१. नक्की सॅलरी पॅकेज म्हणजे काय  ? 

प्रत्येक कम्पनीच्या पगाराचे पॅकेज हे काही छोट्या छोट्या गोष्टींनी बनते .प्रत्येक पॅकेज मध्ये "फिक्स" आणि "व्हेरिएबल " असे मूळ दोन विभाग असतात . "फिक्स" म्हणजे तुम्हाला दर वर्षी नक्की मिळणारा पगार आणि "व्हेरिएबल" म्हणजे तुमच्या /कम्पनीच्या परफॉर्मन्स /बिझनेस रिझल्ट्स वर अवलंबुन असणारा पगार .आणि सध्या ज्या क्षेत्रात आणि विभागात तुम्ही नोकरी करता त्या त्या प्रमाणे या "फिक्स " सॅलरी ची पॅकेज मधील टक्केवारी बदलते. उदा . विक्री ,मार्केटिंग इत्यादी विभागातील कर्मचाऱ्यांना जर १०० रुपयाचे "पॅकेज" असेल तर त्यातील ६० % अथवा कधी कधी तर ५० % पगार फक्त "फिक्स " म्हणजे तुम्हाला नक्की हातात  मिळणार असतो . तुमचे काम जर बॅक ऑफिस चे अथवा ऍडमीन /एच आर वगैरे असेल तर कदाचित हीच टक्केवारी ८० % फिक्स आणि २० % व्हेरिएबल अशी असू शकते . पण एक मात्र खरं की एक सरकारी नोकऱ्या सोडल्या तर सहसा कुठलीही खाजगी कम्पनी आज १०० % फिक्स पगार ऑफर करत नाही . 

या "फिक्स" मध्ये मोठा सहभाग असतो तो असतो मूळ पगार म्हणजे " बेसिक "  सॅलरी चा .ज्यावर तुमचा प्रॉव्हिडन्ट फ़ंड ,ग्रॅच्युइटी वगैरे गणले जातात . तसेच उरलेला फिक्स पगार  घरभाडे भत्ता ,वाहतूक भत्ता ,एल टी ए ( वार्षिक ) ,मेडिकल रिइम्बर्समेंट ,फूड कुपन्स ( तिकीट/सोडेक्सो  ई  ) वगैरे भागांनी बनतो .व्हेरिएबल पगार म्हणजे वार्षिक बोनस /सेल्स कमिशन वगैरे भागांनी बनतो ज्याची "मिळेलच " अशी ग्यारंटी कोणी देऊ शकत नाही .त्यामुळे एखादी कम्पनी १०० रुपया चे "पॅकेज" देत असेल तर त्याचा अर्थ १०० रुपये बँक अकाउंट ला आलेच असा होत नाही . 

तसेच कम्पनी आपल्या कर्मचाऱ्यांना देऊ करीत असलेल्या इतर सोयी,सुविधा सुद्धा " कॉस्ट  टू  कम्पनी" मध्ये धरल्या जातात आणि त्यांची किंमत "पॅकेज" मध्ये दाखवली जाते ! म्हणजे एखाद्या कम्पनीने तुम्हाला १० लाखाचा मेडिक्लेम म्हणजे आरोग्य विमा देऊ केला तर त्याचा जो १०००० वगैरे जो काय वार्षिक हफ्ता असेल तो तुमच्या "पॅकेज" मध्ये १०००० बेरीज करून दाखविले जातात ! हे १०००० तुम्हाला मिळणार नसतात पण कम्पनी तुमच्यावर खर्च करणार असते तो तुम्हाला "बेनिफिट" म्हणून दाखवतात .एखादी कम्पनी तुम्हाला घरापासून ऑफिस पर्यंत बस सर्व्हिस देत असेल तर त्याचा खर्च सुद्धा "पॅकेज" मध्ये दाखविला जाण्याची उदाहरणे आहेत !

तसेच तुमच्या कमाईवर जाणारा इन्कम टॅक्स तर वेगळाच ! त्याचा तर आपण अजून विचार सुद्धा केला नाहीये . म्हणजे १०० रुपयाचे " पॅकेज" वाल्या माणसाला एखाद्या वर्षी कम्पनीची  किव्वा त्याची स्वतः ची कामगिरी चांगली झाली नाही म्हणून सॅलरी स्लिप च्या डावीकडे  ६० रुपयेच "दिसू" शकतात आणि त्या वर सुद्धा सरासरी ३० % इन्कम टॅक्स धरला तर बँकेत ४२ रुपयेच जमा होऊ शकतात !

म्हणजे "सॅलरी पॅकेज" हा फार फसवा प्रकार असतो आणि सामान्य माणसांना तो न समजल्याने पॅकेज भागिले १२ महिने करून "बापरे त्याला एव्हढे लाख महिन्याला मिळतात " अश्या चर्चा आपल्या मराठी मध्यमवर्गीय घरांमध्ये डोळे विस्फारून केल्या जातात ! 

२. बाहेरच्या देशात पण पॅकेजेस अशीच असतात का ? 

अमेरिका,सिंगापूर,ऑस्ट्रेलिया ,युरोपियन देश आदी ठिकाणी सुद्धा हेच फिक्स आणि व्हेरिएबल चे तत्व राबवले जाते . पण त्यांचे "स्ट्रक्चर" वेगळे असू शकते . म्हणजे बऱ्याच तंत्रद्यान क्षेत्रातील कम्पन्या आपल्या "पॅकेज" मध्ये "एम्प्लॉयी स्टॉक ऑप्शन्स" देतात . तसेच पहिल्या वर्षी "जॉइनिंग बोनस" अथवा " साईनिंग बोनस " देतात .हे बोनस फक्त पहिल्या वर्षी मिळतात आणि त्यामुळे दुसऱ्या वर्षांपासून ते गायब होतात . स्टॉक ऑप्शन्स म्हणजे कम्पनीचे शेअर्स सुद्धा असेच दिले जातात जे हळू हळू दर वर्षी काही एक संख्येत कर्मचाऱ्याच्या डिमॅट अकाउंट ला ४ ते ५ वर्षात जमा होतात आणि कर्मचारी ते लगेच विकू सुद्धा शकत नाहीत . या ४/५ वर्षाच्या काळात जर कम्पनीच्या शेअर ची किंमत कमी झाली तर त्याचा फटका कर्मचाऱ्याला बसतो . म्हणजे पॅकेज मध्ये शेअर च्या आजच्या भावात दाखवलेले मनोहारी चित्र कायम राहीलच असे नाही . 



( फोटो : टाइम्स ऑफ इंडिया च्या पब्लिक वेबसाईट वरून साभार.सर्व हक्क टाइम्स ग्रुप कडेच राखीव )

एक  उदाहरण घेऊ  : समजा एखादा विद्यार्थी आज मायक्रोसॉफ्ट मध्ये अमेरिकेत जॉईन करतोय आणि कम्पनी त्याला "पॅकेज " मध्ये ५०० रिस्ट्रिक्टेड स्टॉक ऑप्शन्स देणार असे दाखवतेय,तर सहसा हे ५०० शेअर दर वर्षी १/४ म्हणजे प्रत्येक वर्षाच्या शेवटी  १२५ असे ४ वर्षे जमा होतात .आज मायक्रोसॉफ्ट च्या शेअर ची किंमत साधारण ६८ डॉलर आहे .म्हणजे जरी कम्पनीने त्या विद्यार्थ्याला ५०० शेअर्स देण्याचे कबूल केले असेल तरी त्याचा अर्थ पॅकेज मध्ये पहिल्याच वर्षी त्याला ५०० शेअर X ६८ डॉलर असे ३४००० डॉलर्स म्हणजे आपल्या बाळबोध गणिताप्रमाणे २३,८०,००० रुपये मिळणार नाहीत . पण पॅकेज जाहीर करताना हे सगळे अंतर्भूत करून दाखवले जाते .अमेरिकन आणि युरोपियन कम्पन्यांचे हे नेहमीचे आहे . 

काही कम्पन्या हे शेअर्स कधी विकायचे याचेही नियम घालून देतात .म्हणजे शेअर मिळाल्यापासून २ वर्षे विकायचे नाहीत किंवा कम्पनी सोडली तर अर्धे शेअर परत द्यायचे वगैरे वगैरे . याचाही विचार "पॅकेज" मध्ये केला पाहिजे . 

३. डॉलर मधले पगार जास्त का असतात ? 

याचे साधे उत्तर म्हणजे ,ते जास्त "असण्या" पेक्षा "जास्त" वाटतात कारण आपली डॉलर ला गुणिले ७० करण्याची घाई ! आपण हे लक्षात घेत नाही की जो डॉलर मध्ये कमावतो तो डॉलर मध्येच खर्च करतो ! हे समजून घेण्यासाठी "पर्चेसिंग पॉवर पॅरिटि " हा प्रकार प्रथम समजून घेऊन .याचा अर्थ एखाद्या देशात स्थानिक चलन कोणत्या वस्तू किती भावात विकत घेऊ शकते ! ज्यांना अर्थशास्त्र कळत नाही त्यांच्यासाठी हा मुद्दा समजून घेण्याचा सोपा उपाय म्हणजे "द इकॉनॉमिस्ट" या मासिकाने १९८६ मध्ये गम्मत म्हणून तयार केलेली "बिग मॅक इंडेक्स " ! मॅकडॉनल्ड्स ही फास्ट फूड कम्पनी बहुतेक देशात पसरली आहे आणि त्यांचा प्रसिद्ध बिग मॅक बर्गर त्या त्या देशात किती ला मिळतो यावरून हा तक्ता त्यांनी बनवला . यातून मी वर नमूद केलेला "चलनाची खरेदी करण्याची क्षमता" समजून घेता येईल .

जानेवारी २०१७ च्या किमतीनुसार ५.०६ डॉलर्स ला मिळणार बर्गर भारतातील मॅक्डोनल्ड्स मध्ये १७० रुपयाला मिळतो !  म्हणजे १७०/५.०६ =३३.५९ रुपयाला एक डॉलर असा हिशेब झाला . आपण गणित मात्र नेहमी ७० ने गुणून करतो ! याचा अर्थ भारतात नोकरी करणाऱ्या व्यक्तीला बर्गर खायचा असेल तर अमेरिकेतल्या व्यक्ती पेक्षा अर्धे पैसे भारतीय चलनात पुरेसे होतील .


( फोटो : द इकॉनॉमिस्ट  च्या पब्लिक वेबसाईट वरून साभार.सर्व हक्क इकॉनॉमिस्ट  कडेच राखीव )

आता यातला गमतीचा भाग जरी सोडला तरी ,बाकी "कॉस्ट ऑफ लिव्हिंग" चा विचार केला तरी अमेरिकेत आणि त्यातही कॅलिफोर्निया बे एरिया मध्ये /लंडन /सिंगापूर मध्ये  राहणे भारतापेक्षा फार महाग आहे . आणि त्यामुळे तिकडच्या लोकांना आपल्याला भन्नाट वाटणारे पगार डॉलर मध्ये मिळतात . अजून काही उदाहरणे बघू :

  • सॅन फ्रान्सिस्को मध्ये मेट्रो चे किमान भाडे आहे २.२६ डॉलर आणि आपल्या मुंबई मध्ये ते आहे १० रुपये ! म्हणजे ७० च्या हिशेबाने तिकडची मेट्रो किमान १५८.२ रुपये घेते तर आपला मुंबईकर १० रुपयात मेट्रो मध्ये किमान भाड्यात प्रवास करू शकतो ! 
  • सॅन फ्रान्सिस्को मध्ये १ बी एच के फ्लॅट चे किमान भाडे असते २५०० डॉलर्स ! आणि मुंबई मध्ये अगदी दादर सारख्या ठिकाणी सुद्धा आज १ बी एच के फ्लॅट ३० ते ३५ हजार रुपये महिना भाड्यात मिळतो . याचा अर्थ असा की सॅन फ्रॅंसिस्को मध्ये एका डॉलर ची खरेदी करण्याची क्षमता ही ३५०००/२५०० =१४ रुपये जी खरेदी मुंबई मध्ये करू शकेल तेव्हढी आहे . ७० रुपये नव्हे .



वरील चित्रात सर्वात महाग शहरे लाल रंग छटांमध्ये असून सर्वात स्वस्त शहरे हिरव्या रंग छटांमध्ये आहेत 

( फोटो : नंबिओ च्या पब्लिक वेबसाईट वरून साभार.सर्व हक्क नंबिओ  कडेच राखीव )
  • सिंगापूर मध्ये टॅक्सी भाडे ( एसी ) आहे किमान ३.५ सिंगापूर डॉलर ,आणि मुंबई मध्ये कुल कॅब चे किमान भाडे आहे २८ रुपये . म्हणजे सिंगापूर डॉलर आणि भारतीय रुपये यांचा फॉरेन एक्सचेंज रेट आज जरी १ सिंगापूर डॉलर = ४८  भारतीय रुपये च्या आस पास असला तरी याचा अर्थ असा नाही की भारतात ४८ रुपयात जी वस्तू मिळते ती सिंगापूर डॉलर मध्ये १ डॉलर ला मिळेल .
  • लंडन मध्ये ब्रेड चा एक लोफ मिळतो १ पाउंड मध्ये .पण पुण्यामध्ये तोच ब्रेड ९० रुपयाला नाही तर मिळतो साधारण १५ ते २० रुपयाला ! 
दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिका आणि भारतातील  सामाजिक आणि आर्थिक रचना  ! मनुष्यबळ तिकडे फार महाग असल्याने कितीही कमवत असलात तरी ड्रायव्हिंग / लाऊंड्री /बागकाम /साफ सफाई असली सर्व कामे स्वतः ची स्वतः च करावी लागतात . आपल्या कडे मात्र लोकसंख्या जास्त असल्याने कमी पैशात कामाला माणसे मिळतात . अमेरिकेत चांगल्या पाळणाघराची आठवड्याला २०० डॉलर्स भरावे लागतात .इकडे महिना ४-५ हजारात चांगली पाळणाघरे मिळतात . म्हणजे नुसता पैसा कमवणे एक गोष्ट झाली आणि तिकडे आयुष्य अमेरिकन माणसाप्रमाणे जगणे ही वेगळी गोष्ट झाली .भारतीय समाजात श्रमाला किंमत नसल्याने असली घरगुती कामे सुद्धा बऱ्याच लोकांना कमीपणाची वाटतात आणि मग तिकडे गेल्यावर गपचूप डॉलर वाचवायला सगळी कामे करावी लागतात .ती सुद्धा तयारी तुमची असली पाहिजे . 

हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे जरी एखादा विद्यार्थी १७५,००० अमेरिकन डॉलर ( फॉरेन एक्सचेंज रेट च्या हिशेबाने सव्वा कोटी रुपये ) च्या पॅकेज वर निवडला गेला आणि तो अमेरिकेत /सिंगापूर/लंडन इकडे रहाणार असेल तर त्याला स्थानिक "कॉस्ट  ऑफ लिव्हिंग " प्रमाणे तो पगार तिकडेच खर्च करायचा आहे हे लक्षात घ्या.त्यातही अमेरिकेत त्याला २८ % टॅक्स बसणार  + वर सांगितल्याप्रमाणे त्याचा फिक्स पगार साधारण ५० % असणार तो म्हणजे ८७,५०० डॉलर .बाकी सगळे कामगिरी वर अवलंबुन !

हे सगळं सरासरी काढून पाहिलं तर भारतात रहाणे अमेरिकेपेक्षा साधारण ६४ % स्वस्त आहे ! म्हणजे अमेरिकेत नेट ८७,५०० डॉलर वर्षाला पगार घेणारा, आणि तिकडेच खर्च करणारा माणूस आपली "लाइफस्टाइल" न बदलता इकडे भारतात साधारण २१  लाख पगारात आरामात राहू शकतो . ( प्री टॅक्स )

आता २१ लाख पगार सुद्धा जास्त आहेच ! पण सव्वा कोटी-दीड कोटी च्या स्वप्नातून बाहेर पडलेलेच बरे ! कारण आज भारतीय कम्पन्या /भारतात काम करणाऱ्या बहुराष्ट्रीय कम्पन्या सुद्धा चांगल्या कॉलेजेस मधल्या  फ्रेश आय आय एम  एम बी ए /आय आय टी इंजिनियर्स ना १५ ते २० लाख पगार देतात . त्यातही स्टॉक ऑप्शन्स वगैरे प्रकार कमी असतात . म्हणजे हातात जास्त पगार येतो आणि इकडे त्याच पैशात तुम्ही ड्राइव्हर / कामवाली बाई / माळी  /इस्त्री वाला वगैरे लोकांकडून स्वस्तात कामे करून घेऊ शकता ! 

हे सर्व लिहावेसे वाटले कारण मध्यमवर्गीय घरांमध्ये कोटी-दीड कोटी पगाराच्या नोकऱ्या मिळण्याच्या मीडिया मधील बातम्या नको ती स्वप्ने आणि मुलांवर  दडपण निर्माण करतात . म्हणून बाळबोधपणे  प्रत्येक अमेरिकन डॉलर च्या नोकरीच्या पॅकेजला गुणिले ७० करणं सोडलेलंच   बरं  !

हा लेख आवडला तर जरूर सर्वांबरोनर शेअर करा .विशेषतः पालकांसोबत .फक्त नावासकट आणि ब्लॉग च्या लिंक सकट  शेअर करा ही विंनती 

-चिन्मय गवाणकर ,वसई 
ChinmayGavankar@gmail.com 




Saturday, July 8, 2017

Banks Can Not Refuse to Accept Scribbled Currency Notes

महत्वाचे : ५०० आणि २००० च्या ज्या नोटांवर काही लिहिले आहे /रंग गेलेला आहे / नोटा चुरगळलेल्या आहेत त्या नोटा सुदधा चलनात आहेत आणि बँका त्या नोटा नाकारू शकत नाहीत .



सध्या बऱ्याच ठिकाणी नोटांवर काही लिहिले असेल तर अश्या नोटा दुकानदार स्वीकारत नाहीत. काही बँका सुध्दा अगदी चुकून नवीन २००० आणि ५०० च्या नोटांवर एखादा शाईचा डाग अथवा पेनाने काही मार्क नोटेवर असेल तर अश्या नोटा घ्यायला नकार देत आहेत .

याबाबत एकूणच गोंधळ दिसतो आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती लिहावीशी वाटली :

१. RBI ने ३१ डिसेम्बर २०१३ रोजी  २०१३-१४/१३११ या क्रमांकाचा एक प्रेस रिलीज देऊन त्यात नागरिक आणि बँक अधिकारी यांना नोटांवर काहीही न लिहिण्याचे आवाहन केले होते . हे RBI च्या "क्लीन नोट पॉलिसी" अंतर्गत होते . नोटांवर काही बाही लिहून त्या खराब होतात आणि त्यामुळे कृपया नोटांवर काही लिहू नका असे सांगण्यात आले होते.परंतु लिहिलेल्या नोटा वैध चलन नाहीत असे कुठेही म्हटले नाहीये .

२.याच "क्लीन नोट पॉलिसी" अंतर्गत २००२ पासून RBI  ने  बँकेच्या कर्मचाऱ्यांना नोटांची बंडले स्टेपल करू नका असे सांगितले होते .

३.परंतु "नोटांवर" लिहू नका असे म्हटले म्हणजे "नोटा घेऊच नका" असा सोयीस्कर अर्थ लावून काही बँकांनी प्रथम अश्या नोटा घेण्यास नकार देण्यास सुरुवात केली .

४. RBI  ने मात्र दिनांक २५ एप्रिल २०१७ रोजी एक विशेष सर्क्युलर काढून नोटांवर काहीही लिहिले असले /नोटांचा रंग गेला असला इत्यादी काहीही असले तरी ५०० आणि २००० च्या नव्या नोटा बँकांनी स्वीकारणे बन्धनकारक आहे असे स्पष्टपणे म्हटले आहे . या सर्क्युलर चा सन्दर्भ क्रमांक आहे ४५३०/०४.०००.००१/२०१६-१७ ज्याची प्रत जोडत आहे .





तरी कृपया या सर्क्युलर चा नम्बर नोट करा आणि कुठल्याही बँकेने /संस्थेने आपल्या नोटा घ्यायला नकार दिला तर आपल्या जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांशी अथवा RBI च्या महाराष्ट्र -गोवा क्षेत्रीय बँकिंग लोकपाला कडे कडे तक्रार करू शकता . त्यांचा सम्पर्काचा पत्ता खालीलप्रमाणे :

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ,भायखळा ऑफिस ,मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन च्या समोर ,भायखळा ,
मुंबई-४०० ००८ ,फोन : ०२२-२३०२२०२८,ईमेल : bomumbai@rbi.org.in

आपल्या जिल्ह्याच्या अग्रणी बँकेचा सम्पर्क क्रमांक आणि पत्ता खालील वेबसाईट वर मिळू शकेल : ( स्टेट : महाराष्ट्र असे टाईप करून सर्च बटन दाबा  )



पालघर जिल्ह्यासाठी आपल्या जिल्हा अग्रणी बँकेचे ( बँक ऑफ महाराष्ट्र ) व्यवस्थापक श्री अनिल सावंत साहेब यांच्याकडे ०२५२५-२९७४७४ या क्रमांका वर तक्रार करू शकता . नागरिक/दुकानदार यांनी सुद्धा न घाबरता चुकून काही लिहिलेल्या/डाग असलेल्या नोटा कोणी दिल्याच तर त्या स्वीकाराव्या कारण त्या वैध चलन आहेत .अश्या नोटा तुम्ही बिनधास्त बँकेत भरू शकता .परंतु एकूणच आपल्या देशाच्या चलनाचा मान राखण्यासाठी कृपया नोटांवर काही लिहू नका अशी नम्र विंनती .

कृपया ही माहिती सर्व महाराष्ट्र भर पाठवा आणि नागरिकांना या महत्वाच्या विषयाची माहिती करून द्या .कृपया या ब्लॉगच्या लिंक सकट आणि लेखकाच्या नावाने मेसेज फॉरवर्ड केल्यास उत्तम :-) 

धन्यवाद 
चिन्मय गवाणकर ,वसई 
Chinmay.Gavankar@Gmail.com