The Gavankars

Sunday, July 19, 2015

गणेशोत्सव :एक मुक्त चिंतन आणि पापडी,वसई येथील रोशन अपार्टमेंट मधील सदस्यांचे कौतुकास्पद पाऊल (नक्की वाचा व आपल्या मराठी मित्रां बरोबर शेयर करा )

सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव रस्त्यावर मंडप टाकून  साजरा करण्या विरोधातील कोर्टाच्या निर्णयावरुन बरेच राजकीय वादळ उठले आहे.खर तर रस्ते अडवून मांडव टाकणे,जोर जोरात अहोरात्र डी जे वाजवून ,अचकट विचकट नाच करून दारू पिऊन मिरवणुकीत नाचणे इत्यादि गोष्टींचा धार्मिक श्रद्धे शी काहीच सम्बन्ध नाही.पण गणेशोत्सवात आपले बॅनर लावून "चमको" गिरी करणाऱ्या आणि धार्मिक श्रद्धेच्या नावाखाली बाजार मांडलेल्या राजकीय उपटसुभांनी उगाच "हिन्दू खतरे में " असल्या बोम्बा मारायला सुरुवात केलीय.

लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने उत्सव सुरु केला तो आज साध्य होतोय ?आज प्रत्येक गल्लीत किमान तीन मंडळे आप आपले वेगळे "सार्वजनिक" गणपति आणतात.काय गरज आहे ?एक गाव एक गणपति का असू नये ?गणपति बाप्पा ला आपण राजकीय नेत्यांच्या वळचणी ला का बांधले आहे ?

आपण जर मंडळानची संख्या कमी केली तर आपसुकच रस्ते अडवून मांडव घालायचा प्रश्नच येणार नाही.परिसरा मधल्या एखाद्या शाळेत/मैदानात /मंदिराच्या आवारात/पार्टी हॉल मध्ये वगैरे बाप्पा आनंदाने 10 दिवस राहतील .

आता लगेच काही लोकांना आम्ही हिंदू विरोधी वगैरे वाटू!इतर धर्मान विरुद्ध का नाही बोलत इत्यादि कॉमेंट्स सुरु होतील .तर मुद्दाम सांगतो मी स्वत्: एक आस्तिक हिन्दू असून रोज सकाळी गणेश मंदिरात गेल्या शिवाय कामाला सुरुवात करत नाही.( याला श्रद्धा म्हणा की अंधश्रद्धा .काही फरक पड़त नाही ) .इतर काय करतात यापेक्षा आम्ही चांगल काय करू याचा विचार करायला शिका ."त्यांचा" रस्ता अडवून नमाज तर "आमची"  महाआरती असले निर्बुद्ध आणि भावना भड़कावू विचार केल्याने नव्वदी च्या दशकात मुंबई ने ज्या दुर्दैवी  धर्मिक दंगली पहिल्या त्या पुन्हा घडू नयेत अशी प्रत्येक नागरिका ची किमान अपेक्षा आहे.म्हणून इतरांना बोला आम्हाला का असा हट्ट बालिश आहे .

या सर्व पार्श्वभूमीवर कोणाचाही बाह्य दबाव नसताना स्वयंस्फूर्ती ने कायदेशीर आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पापड़ी वसई येथील रोशन अपार्टमेंट मधील सदस्यांनी एकत्र येऊन घेतलेले खालील निर्णय कौतुकास्पद ठरतात :

1.दर वर्षी नवीन प्लास्टर ऑफ़ पॅरिस ची मूर्ती आणून तिचे विसर्जन न करता एकच दीड ते दोन फूटी मूर्ति शोभे साठी आणायची आणि तीच मूर्ति टिकेल तो पर्यन्त दर वर्षी फार फार तर नवीन रंग देऊन वापरायची.पुजेपुरती एक छोटीशी शाडु ची मूर्ति आणून तिचे विधिवत विसर्जन करायचे .हीच पद्धत पुण्यामध्ये काही सार्वजनिक मंडळं वापरतात.पण तिकडे मोठ्या मूर्ति विसर्जन करण्यासाठी दर वर्षी नदीला तेव्हढे पाणी नसते म्हणून नाइलाजाने ही पद्धत पडली आहे .पण वसई मध्ये मात्र विस्तीर्ण समुद्र असल्याने विसर्जनाची काहीच अडचण नाही.

तरी सुद्धा केवळ पर्यावरण रक्षणा साठी रोशन अपार्टमेंट च्या सदस्यांनी हा निर्णय घेतलाय.

2.या वर्षी पासून गणपती च्या तसेच मांडवा च्या सजावटी साठी रोशन अपार्टमेन्ट कॉम्पलेक्स मध्ये फक्त कमी वीज वापरणारे LED लाइट्स वापरले जातील.भगभगीत प्रकाशा चे हैलोजन बंद !

3.गणेशोत्सवात जर संगीत लावायचे असेल तर त्याचा आवाज 40 डेसिबल पेक्षा मोठा होणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार रात्रि 10 वाजता सर्व आवाज बंद करण्यात येईल.

4.गणेशोत्सवात केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम न करता सामाजिक जाणीव आणि समाज प्रबोधन होईल असे कार्यक्रम केले जातील.वसई पूर्वेच्या आदिवासी पाड्यांमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या रामकृष्ण मिशन आश्रमा तील स्वामी अवधूतानंद यांचे व्याख्यान गणेशोत्सवा च्या पहिल्या दिवशी आयोजित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मित्रांनो,आपण सुद्धा शांत विचार करून आपल्या सोसायटी/आळी/कॉलनी/गावा मधला गणेशोत्सव असा सुंदर ,साधा आणि पर्यावरणपुरक नाही का साजरा करु शकणार ?जितका लाऊड डी जे किव्हा जीतकि उंच मूर्ती तितकी मोठी आपली भक्ती असे काही असते का ?की 80 % रस्ता अडवून मंडप बांधला नाही तर बाप्पा प्रसन्न होतच नाहीत ?

बघा पटतय का .पटल तर आपल्या मित्रांबरोबर शेयर करा.

धन्यवाद

चिन्मय गवाणकर
वसई

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home