The Gavankars

Thursday, August 8, 2013

Good that Shivdi Nhava Trans Harbour Link is not happening (Marathi)


शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक साठी या वेळी सुद्धा कुणीही बोली जमा केल्या नाहीत आणि प्रकल्प आता काही काळ तरी पुढे गेला हे वाचून फार बरे वाटले . याचे कारण असे की हा प्रकल्प फक्त खाजगी वाहनांना सोयीस्कर ठरणार आहे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला यात दुर्लक्षित करण्यात आले आहे . जेव्हा या सी लिंक वर एक रेल्वे चा सुद्धा मार्ग व्हावा अशी कल्पना काही वाहतूक तज्ञांनी मंडळी तेव्हा यास सरकारकडून प्रतिसाद मिळाला नाही . आपले सरकार खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी असले प्रकल्प राबविण्याचे धोरण का राबवीत आहे हेच काळात नाही . नवी मुंबई मधल्या जागांचे भाव वाढविण्यासाठी एक विमानतळाचा घोळ राजकारण्यांनी घालून ठेवलाच आहे त्यात आता हा प्रकल्प . म्हणजे दक्षिण मुंबई मधल्या धनिकांनी नवी मुंबई मध्ये मोठी घरे आणि फार्म हाऊसेस घेऊन तिकडून या सी लिंक ने अर्ध्या तासात आपल्या कार्यालयात महागड्या गाड्यान मधून सामान्य माणसांना न परवडणारा टोल भरून टेचात यावे असा हा एकंदरीत मामला दिसतो !

त्यापेक्षा शिवडी आणि न्हावा शेवा या दोन समुद्र किनार्यान दरम्यान जलवाहतुकीचा अथवा पूलच बांधायचा झाला तर रेल्वे चा पर्याय शासन का विचारात घेत नाही बरे ? जगभरामध्ये समुद्रकिनारा अथवा मोठा नदीकिनारा लाभलेल्या प्रत्येक मोठ्या शहरात उपनगरी जलवाहतुकीचा पर्याय मोठ्या प्रमाणात वापरला जातो . आपणच का कपाळ करंटे या बाबतीत ?जर नवी मुंबई मध्ये राहणारे एक मंत्री महोदय आपल्या खाजगी हाय स्पीड बोटी मधून मंत्रालयात बैठकीला येउन आपला रस्ते प्रवासाचा त्रास आणि वेळ वाचवीत असतील तर तो पर्याय बोटीचे तिकीट काढून का होईना सामान्य माणसांना का असू नये ?जलवाहतूक चालू करण्यासाठी काही पायाभूत सुविधा आणि योग्य त्या परवानग्या जरी गणितात धरल्या तरी त्याला लागणारा वेळ आणि खर्च हा सध्या सी लिंक साठी प्रस्तावित असलेल्या जवळ जवळ नऊ हजार कोटी रुपयान पेक्षा किती तरी कमी होईल .

आता दुसरे उदाहरण रेल्वे चे जर रेल्वे बांधायची झाली तर खर्च नक्कीच जास्त होईल पण निदान त्या वरून उपनगरी गाड्या चालू करून एकाचवेळी जास्त लोकांची वाहतूक चालू होईल . तसेच मुंबई वरील ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यामधील लहान लहान गावांमध्ये पर्यावरणपूरक विकास करून म्हाडाला परवडणार्या घरांची रुग्णालये, शाळा ,महाविद्यालये वगैरे असलेली स्वयंपूर्ण नगरे सुद्धा उभारता येतील . जर रायगड मधून रेल्वे ने अथवा बोटीने कार्यालयात सुखकर रित्या अर्ध्या तासात पोहोचता आले तर लोक बकाल मुंबई सोडून नक्कीच अश्या सुंदर उपनगरांमध्ये राहायला जातील . मुळात वाशी ची नवी मुंबई करण्यात आली ती याच उद्देशाने ,पण राजकारण्याच्या पैशाच्या हव्यासाने त्या सुंदर नगराची "जुनी मुंबई" कधी झाली ते समजलेच नाही !

युती सरकार ने नव्वदी च्या दशकात मुंबई मध्ये उड्डाणपूल बांधून आपली पाठ कितीही थोपटून घेतली तरी या उड्डाण पुलान्मुळेच मुंबई मध्ये खाजगी गाड्यांची गर्दी वाढली हे नाकारता येणार नाही . त्या पेक्षा तेव्हाच दूरदृष्टीने विचार करून मेट्रो बांधली असती तर आज मुंबई चा चेहरा मोहरा वेगळा असता . त्यामुळे तीच चूक पुन्हा सरकारने करू नये आणि ट्रान्स हार्बर लिंक साठी टेंडर ला प्रतिसाद न मिळणे हि इष्टापत्ती समजून पुन्हा नीट आढावा घेऊन जलवाहतूक अथवा रेल्वे चा पर्याय सुद्धा तपासून पहावा  अशी विनंती !

 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home